सेलू (प्रतिनिधी):
नूतन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागांतर्गत काजळी-रोहिणा गावात राबविण्यात आलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा आज यशस्वी समारोप झाला. या सात दिवसांच्या कालावधीत स्वयंसेवकांनी गावात विविध सामाजिक उपक्रम राबवून ग्रामविकासात मोलाचे योगदान दिले.
शिबिराच्या समारोपानिमित्त नूतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम.लोया , प्रमुख पाहुणे म्हणून श्री. दत्तारावजी पावडे, भगवान महाराज, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्तम राठोड, उपप्राचार्य प्रो. डॉ.आर. एम. खाडप यांनी काजळी-रोहिणा ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी गावात एन.एस.एस. स्वयंसेवकांमार्फत करण्यात आलेल्या विविध कामांची तसेच ग्रामपंचायतीच्या कामकाजाची पाहणी केली. गावातील स्वच्छता, जलसंधारण आणि जनजागृतीपर कामांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आज सकाळच्या सत्रात प्रभात फेरी काढून पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. यामध्ये महाविद्यालयातील मुलींनी स्त्री शिक्षणाच्या समस्या, उलगडून दाखवणारी पथनाटिका सादर केली. यामध्ये श्रद्धा गिराम, ऋतुजा ढगे, उषा काकडे, प्रतीक्षा काकडे, वैष्णवी काकडे, सुनिता सोळंके,सचिता गोरे, शिवकन्या साठे या स्वयंसेवक विद्यार्थिनींचा सहभाग होता.
आजच्या समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा कारके या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी तर आभार श्रद्धा गिराम हिने मानले, तत्पूर्वी भक्ती ऋतुजा व रंजवे या विद्यार्थिनींनी सात दिवसीय शिबिरा विषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी डॉ. सुरेश उगले, डॉ. किर्ती निराळवाड, डॉ. विकास गवई आणि डॉ. आर. जे. नाथानी यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिर कालावधीत ग्रामस्थांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आणि सहकार्याबद्दल या सर्व पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांचे जाहीर आभार मानले.
या संपूर्ण उपक्रमात शुभांगी नायकल, प्रा. अर्चना कांबळे यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी दत्ता रिट्ठे आणि पंकज मगर यांनी सक्रिय सहभाग नोंदवून कार्यक्रमाच्या नियोजनात मोलाचे योगदान दिले. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीची भावना वृद्धिंगत झाल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
Post a Comment
0 Comments